स्वार्थातून परमार्थ - १

आशिष महाबळ

पृथ्वीतलावरील सर्वात स्वार्थी प्राणी निर्विवादपणे मानव आहे. हे बहुधा आपल्या विचारांमधे आपल्या जनुकांकडुन (genes) आले असावे. आपल्या जीन्स स्वार्थी असल्यानेच आपण निसर्गात टिकलो, विविध परिस्थितींमधे जगायला व फोफावायला शिकलो. या स्वार्थाचे केंद्र नेमके काय आहे व त्याचा परीघ किती आहे याचा थांग लागणे तसे कठीण, पण धार्मिक, प्रादेशिक व त्यामुळे राजकीय पैलुंद्वारे एक छोटा प्रयत्न करू या.

भाग १

स्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत

एका गोष्टीत अकबर एकदा बिरबलाला विचारतो की आपल्याला सर्वात प्यारे काय असते. उत्तरादाखल बिरबल एका रिकाम्या हौदात एका माकडीणीला तिच्या पिल्लासोबत उतरवतो व हौदातील पाण्याची पातळी वाढवणे सुरु करतो. आधी तर पिल्लाला वाचवायला म्हणुन माकडीण त्याला डोक्यावर घेते. पण जसे तिच्या जिवावर बेतते तसे ती सरळ पिल्लाला खाली टाकून त्याच्यावर चढून स्वत:चा जीव वाचवू पहाते.

गोष्टी व उदाहरणांवरुन स्वार्थासारख्या गुंतागुंतीच्या विषयाची काही अंगे कळली, व कदाचित पटली जरी, तरी इतर अनेक पैलू वेगळ्या परिस्थितींमधे समोर येऊ शकतात. पृथ्वीतलावरील सर्वात स्वार्थी प्राणी निर्विवादपणे मानव आहे. हे बहुधा आपल्या विचारांमधे आपल्या जनुकांकडुन (genes) आले असावे. आपल्या जीन्स स्वार्थी असल्यानेच आपण निसर्गात टिकलो, विविध परिस्थितींमधे जगायला व फोफावायला शिकलो. या स्वार्थाचे केंद्र नेमके काय आहे व त्याचा परीघ किती आहे याचा थांग लागणे तसे कठीण, पण धार्मिक, प्रादेशिक व त्यामुळे राजकीय पैलुंद्वारे एक छोटा प्रयत्न करु या. जास्त कळीचा मुद्दा अर्थात हा आहे की त्यात बदल घडवून आणण्याची गरज आहे का, ते शक्य आहे का, व असल्यास कसे?

स्वार्थाच्या केंद्राच्या जवळपास स्वत्व नक्कीच असते. त्याचमुळे

(१) माझी खेळणी, माझा पैसा, माझी गाडी इत्यादी विचार डोकावतात. याचबरोबर

(२) माझे मित्र, माझे कुटुंबीय अशी थोडी पसरट भावना पण असते. यापुढील जास्त व्यापक आणि त्यामुळेच कदाचित जास्त धूसर अशा

(३) माझा देश, माझे राज्य, माझे गाव, माझा परीसर, माझे शेजारी या संकल्पना. पृथ्वीवर वरील (१) व (२) क्रमांकाच्या गोष्टी सर्व मानवांमधे आढळतात. (३) मधील माझा देश ही भावना सद्य परिस्थितीत दुर्दैवाने वैश्विक असली तरी देशाच्या घडणीवरून आणि इतिहासानुसार राज्य/गाव/परिसर यावरील प्रेमाची तीव्रता ठरते. उदा. काही देश भौगोलिक आकाराने छोटे असल्याने राज्यांमध्ये विभागलेले नाहीत. वरील तिन्ही प्रकार मूर्त आहेत, भौतिक आहेत. या सर्वांना छेदणार्‍या आणि त्या पलिकडे जाणार्‍या दोन संकल्पना आहेत त्या म्हणजे

(४) माझा धर्म (जात या अर्थाने) आणि माझी संस्कृति (आणि त्या अनुशंगाने येणारे भाषा, पेहराव इत्यादी अंगे).

(१) मधील सर्व गोष्टी, (२) मधील मित्र (व क्वचित प्रसंगी कुटुंबीय) तसेच (३) मधील देश सोडून इतर गोष्टी देश/भाषा व धर्मावरून ओवाळून टाकायला लोक तयार होतात. बहुतांश देशांकरता देश व भाषा या वेगळ्या गोष्टी नसतात कारण बहुतांश नागरीक एकच बोली बोलतात. अनेक देशांमधे बहुजनधर्मही एकच असतो (ऐतिहासिक कारणांमुळे किंवा राज्यकर्त्यांच्या असमावेशक धोरणांमुळे). स्वतंत्र भारताची परिस्थिती एकमेवाद्वितीय आहे. अनेक धर्मांचा या भूमीवर जन्म व प्रसार झाला. बहुसंख्य असलेले हिंदू, बौद्ध इ. धर्म जात्याच सोशिक. स्वातंत्र्याच्या वेळी असे ठरविले गेले की या देशात सर्व धर्मीयांना समान हक्क असतील, स्त्री व पुरुषांना मतदानाचा हक्क असेल. देशाच्या आकारमानामुळे राज्यांमधे विभागणी आवश्यक होती. ती भाषेच्या अनुषंगाने करण्यात आली. या विभागणीप्रमाणे प्रत्येक राज्यात विविध धर्माचे, पण सर्वसाधारणपणे एकच भाषा बोलणारे नागरिक होते. अशातर्‍हेने जन्मला अर्वाचीन काळातील राज्यशासनाचा एक अभूतपूर्व प्रयोग.(*)

स्वार्थ: इकडे, तिकडे, चोहीकडे

जगायला अन्न अत्यावश्यक. ते, व वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टी प्राप्त झाल्या की जास्त प्रगल्भ (sophesticated) गोष्टींच्या मागे मानव लागतो. पण त्या देवाणघेवाणीत देखील जगणे कसे महत्वाचे आहे हे दर्शवणारा हा एक (थोडाफार केविलवाणा) विनोद पहा: "बरे नसले की वैद्याकडे जावे (कारण ती जगायला हवी), तिने सांगीतलेले औषध केमिस्टकडून आणावे (कारण तो जगायला हवा), घरी येऊन ते टाकून द्यावे (कारण आपणही जगायला हवे)." बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे असले विनोद केवळ त्यांच्या तात्पर्याकरता. वेगवेगळ्या लोकांचे स्वार्थ वेगवेगळ्या ठिकाणी असतात, कमीअधिक असतात. निदान खालील तीन पातळ्यांवर प्रत्येक व्यक्ती कळत-नकळतपणे विचार करत असते.

(१) आपले/आपल्या परिवाराचे उत्थान व्हायला हवे (तरच जन्माचे सार्थक होणार).

(२) देश/धर्म/संस्कृति यांचे भले व्हायला हवे (या कल्पना कितीही कृत्रिम आणि विभाजक असल्या तरी आपापल्या स्थानी त्यांचे महत्व आहे).

(३) मानवता वृद्धिंगत व्हायला हवी (त्यातच इतरांचे - आणि पर्यायाने त्यांच्या दृष्टीत आपले - हक्कसुद्धा समाविष्ट असतात).

एकतर या तिन्ही संकल्पना (स्वादी, देशादी आणि मानवता) तशा निसटत्या आहेत, आणि सहज अलग करण्यासारख्या नाहीत. तसेही प्रत्येक स्वार्थ स्व पर्यंत पोचतोच. उदा. धर्म एकतर इहलोकातील, नाही तर परलोकातील, स्व करता असतो. श्रद्धेपोटी असो वा भीतीपोटी असो, किंवा निव्वळ रोजच्या जीवनातील एक साथ देणारी नियमितता म्हणून असो. धर्मप्रसारही स्व करताच असतो, आमचा एकनाथ स्वीकारला तरच खरे म्हणणार्‍या ख्रिस्चन असो, की तसे सगळे हिंदूच असे म्हणणार्‍या साईभक्त असो. दोघीही खात्री करत असतात की ते इतरांना पटू शकेल असे असले तर खरे असावे. नाहीतर लोक ऑर्गनाईस्ड धर्मामागे न लागते. स्वत:पुरताचा धर्म इतरांना साधारणपणे त्रास देत नाही.

धर्माच्यामानाने देशप्रेम समजायला जास्त अवघड आहे. बहुदा बाळकडूचा तो एक प्रकार असावा व त्याचा सतत पुनरुच्चार न झाल्यामुळे असेल, देश बदलणे हे धर्म बदलण्या पेक्षा सोपे जात असावे. अर्थात फक्त जन्माने एका धर्माचे असुन प्रत्यक्षात निधर्मी असलेले लोक अनेक धर्मात व देशांमधे असतातच. आपल्या मुळाची, स्रोताची ओढ कुठेतरी असतेच. कदाचित हे सालमन मासे व मोनार्क फुलपाखरे यांच्या प्रमाणे आपल्या जनुकांमुळेच असेल. त्यामुळे स्वदेशाचे आकर्षण वाटत असावे. ऑर्गनाईस्ड धर्माप्रमाणेच मिलिटरी राजवट किंवा अपूर्ण कम्युनिझम (आणि ती संपूर्ण असणे अशक्यच) अडचणीची असते. लोकशाही विना-अडचण नसते, पण सध्या उपलब्ध असलेले ते सर्वोत्तम साधन आहे. एक शासन करण्याचा घटक म्हणून, एखाद्या कुटुंबाप्रमाणे, ती स्वीकार्य आहे.

मानवता म्हणुन जेंव्हा काही केल्या जाते तेंव्हा 'तशा परिस्थितीत आपण असतो तर लोकांनी आपल्याकरता काय करावे असे आपल्याला वाटले असते' हा सुप्त विचार मनात असतो. पुन्हा स्वार्थच, पण दुसर्‍याला मदत करणारा.

कोणतीही गोष्ट, छोटी अथवा मोठी, करत असतांना ती वरील तीन पैकी कोणकोणत्या प्रकारात मोडते हे सांगणे कठीण असते, व त्याबद्दल जाणीवपूर्वक विचार क्वचितच केल्या जातो. त्यामुळे भ्रष्टाचार (केवळ स्व ला महत्व देणे), देशद्रोह/ethnic cleansing [जातीय सफाई?] (दुसर्‍या मुद्याला अवाजवी महत्व देणे), आणि अमानुषता (तिसर्‍या घटकाला दुय्यम लेखणे) यासारख्या गोष्टी राजरोसपणे घडतात.

१ |